*विजेच्या तारेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू*महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप. (सिल्लोड तालुका प्रतिनिधी)अजिंठा-बुलडाणा रोडवर एका दुर्दैवी घटनेत अक्षय शंकर धनवई (वय २५, रा. शिवना, ता. सिल्लोड) या युवकाचा विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी (महावितरण) बुलडाणा येथील कार्यकारी अभियंता, पाडळी उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता अरुण गुलाबराव खरात आणि विद्युत सहाय्यक उषा गावीत यांच्या निष्काळजीपणामुळे अक्षयचा मृत्यू झाल्याचा आरोप अक्षयचा मोठा भाऊ अभिषेक शंकर धनवई यांनी केला आहे.अभिषेक शंकर धनवई यांनी दिलेल्या लेखीफिर्यादीनुसार, दिनांक ६ जून २०२५ रोजी अक्षय हा बोलेरो पिकअप वाहनात फळरोपे घेऊन शिवना येथून जात होता. अजिंठा-बुलडाणा रोडवरील चौथ्या रोडवर, मुख्य रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर दोन विद्युत खांबांमधील तारेला मोठा झोल पडलेला होता. या दोन्ही खांबांमधील अंतर सुमारे ४०० फूट होते. या झोल पडलेल्या तारेचा वाहनाला स्पर्श झाल्याने वाहनात वीजप्रवाह उतरला आणि त्यात अक्षयला विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. अभिषेकने रंगनाथ रघुनाथ काळे आणि भारत गंगाधर सपकाळ यांच्यासोबत ८जून २०२५ रोजी घटनास्थळाला भेट दिली असता, दोन्ही पोलमधील अंतर ४०० फूट असल्याचे आणि पोलची उंची कमी असल्याचे निदर्शनास आले. तसेच, झोल पडलेली तार रस्त्यापासून अंदाजे १२ फूट उंचीवर होती आणि त्यातून विद्युत प्रवाह वाहत होता.फिर्यादीनुसार, वीज प्रवाह, जोडणी आणि त्यांचे मेंटेनन्स करण्याचे काम महावितरणच्या कार्यकारी अभियंता, बुलडाणा यांच्या अखत्यारीत येते. पाडळी उपकेंद्राअंतर्गत असलेल्या वीज प्रवाह, जोडणी आणि देखभाल दुरुस्तीचे काम कनिष्ठ अभियंता अरुण गुलाबराव खरात यांच्याअंतर्गत येते, तर विद्युत सहाय्यक उषा गावीत यांच्याकडेही याची जबाबदारी होती. अभिषेकने आरोप केला आहे की, घटनास्थळाजवळील तारेला झोल पडलेला असताना आणि त्यातून विद्युत प्रवाह वाहत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळेच अक्षयचा मृत्यू झाला. या घटनेस कनिष्ठ अभियंता अरुण गुलाबराव खरात, विद्युत सहाय्यक उषा गावीत आणि संबंधित देखभाल दुरुस्ती व जोडणी करणारे ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप अभिषेक यांनी केलाआहे. घटनेच्या दिवशी मानसिक स्थिती ठीक नसल्याने अभिषेक त्यावेळी तक्रार देऊ शकला नव्हता. मात्र, आता त्यांनी संबंधित लोकांविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0