*आठवडी बाजारासाठी निश्चित जागा द्यावी –प्रफुल चटकी यांची नगर परिषदेला मागणी*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती)भद्रावती दि.13 :- शहरातील आठवडी बाजार सध्या मुख्य रस्त्यांवर भरत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे, तसेच चोरीसारख्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने, या बाजारासाठी एक निश्चित व स्थायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रफुल चटकी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रत्येक बुधवारी भद्रावती शहरात आठवडी बाजार भरतो. सध्या बाजारपेठ मुख्य रस्ते, रहदारीचे मार्ग व सार्वजनिक ठिकाणी भरत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या बाजारात ३०० ते ४०० हून अधिक दुकानदार आपला व्यवसाय करतात. त्यामुळे बाजारात प्रचंड गर्दी होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही धोका वाढत आहे. आठवडी बाजार सध्या शहरातील मुख्य रस्ता, जुना बस स्टँड, बाजार वार्ड, किल्लावार्ड, भोजवार्ड, हनुमान नगर, बंगाली कॅम्प, लिंबुनी नगर, सूर्यमंदिर वॉर्ड, साई नगर आदी परिसरांतील रस्त्यांवर भरत असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर शहरात एक मोकळी व नियोजित जागा आठवडी बाजारासाठी निश्चित करून सर्व दुकानदारांना तेथे स्थलांतरित करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी माजी उपाध्यक्ष तथा नगर सेवक प्रफुल चटकी आणि माजी नगरसेवक राजु सारंगधर यांनी संयुक्तपणे दिलेल्या निवेदनातून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. बाजारासाठी स्वतंत्र जागा निश्चित झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी, चोरीचे प्रकार आणि नागरिकांचा त्रास यावर प्रभावी उपाय होऊ शकतो, असा विश्वास या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0