मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत, हवामान खात्याकडून रेड अलर्ट. (भास्कर लिंगम, प्रतिनिधी मुंबई :) रविवारी रात्री मुसळधार पावसाने मुंबईकरांची झोप उडवली. काही तासांच्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई व उपनगरांसह महाराष्ट्रातील काही भागांना ऑरेंज ते रेड अलर्ट जारी केला आहे.दिवसभर आकाश ढगाळ असून पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषतः सायन, दादर, अंधेरी, कुर्ला, भांडुप आणि मालाड परिसरात पाणी साचले आहे. बीएमसीकडून तातडीने पाणी उपसण्याचे यंत्रणेवर काम सुरू करण्यात आले आहे.मुंबईसोबतच महाराष्ट्राच्या इतर भागांतही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण किनारपट्टी, पुणे, ठाणे व रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असून काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, ओडिशा राज्यातही मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली असून काही भागांत जीवित आणि वित्तहानी झाली आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) सज्ज असून स्थानिक प्रशासनालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच अधिकृत यंत्रणांकडून दिलेल्या सूचना व अलर्टकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0