सात वर्षांनी तो अचानक परतला अन् आईचे अश्रू अनावर.... (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : सात वर्षापूर्वी काहीही न सांगता घरातून गेलेला युवक ध्यानीमनी नसताना अचानक समोर उभा राहिला आणि आईच्या डोळ्यातून आनंदाश्रुंचा पाझर वाहू लागला. अत्यानंदाने त्या मातेने त्याला घट्ट मिठी मारत त्याचे स्वागत केले. कळंबु ता. शहादा येथे आज या आनंददायी घटनेचा सुखद अनुभव ग्रामस्थांना आला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दोन पैसे मिळावेत या हेतूने सहा वर्षांपूर्वी कामानिमित्त शहरी भागात गेलेला कळंबु येथील तरुण त्यानंतर घरी परतलाच नाही, त्यानंतर कुटुंब व नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने निराश होऊन याबाबत पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र सात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला मुलगा 03 जुलै 2024 रोजी अचानक घरी परतल्याने हा दिवस त्याच्या कुटुंबासाठी दिवाळी पर्वाचा ठरला. शहादा तालुक्यातील कळंबू येथील कै. वामन एकनाथ चित्ते (कुंभार) यांचा मुलगा तसेच सेवानिवृत्त अभियंता हिम्मतराव चित्ते यांचा पुतण्या शेषराव चित्ते हा सन 2018च्या सप्टेंबर महिन्यात म्हणजे सहा वर्षांपासून कामानिमित्त शहरी भागात जातो असे कुटुंबास सांगून गेला होता. मात्र त्यानंतर काही महिने उलटूनही शेषरावशी संपर्क होत नसल्याने कुटुंब व नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने निराश होऊन त्याची पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र बेपत्ता व्यक्ती अचानक घरी परतणे हा योगायोगच समजावा असाच अनुभव येथील कुंभार कुटूंबाला अनुभवयास आला. कै. वामन कुंभार व पत्नी भटाबाई ह्या आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळून दोन मुली व दोन मुलांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होते. मात्र 2016मध्ये वामन कुंभार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर पूर्ण संसाराची जबाबदारी पत्नी भटाबाई यांच्यावर आली. ती माता चौघा अपत्यांच्या मदतीने मोलमजुरी करून कुटूंबाचा रहाटगाडा सुखरूप चालवीत होत्या. त्यादरम्यान लहान मुलगा शेषराव कामानिमित्त बाहेर गावी जातो असे सांगून बेपत्ता झाल्याने पती पाठोपाठ कर्ता मुलगा कुटुंबातुन एकाएकी बेपत्ता झाल्याने संपुर्ण कुटुंबच हताश झाले होते. पुतण्या बेपत्ता झाल्याने सध्या धुळे येथे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त अभियंता काका हिम्मतराव चित्ते व त्यांच्या धर्मपत्नी कल्पना चित्ते यांनी परिस्थितीची जाणं राखत स्वखर्चाने पुतण्याचा शोध घेण्यासाठी मुंबई, पुणे, सुरत, नाशिक अश्या विविध बड्या शहरात जाऊन ठिकठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेषरावचा थांगपत्ता लागत नसल्याने हताश होऊन हिम्मतराव चित्ते यांनी याबाबत पुतण्या हरविल्याची नोंद पोलिसांत दिली होती. पोलिसांनीही त्यांच्या परीने शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कुठेही धागेदोरे लागत नसल्याने संपूर्ण कुटूंब हताश झाले होते. तब्बल सात वर्षे उलटूनही मुलाचा पत्ता लागत नसल्याने शेषरावचा घात अथवा अपघात झाल्याचा संशय मनाशी बाळगुन त्याचा विसर पडला. मात्र देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय कुंभार कुटुंबाला आला. ता. 02 जुलैचा दिवस भटाबाई व कुटुंबासाठी आनंदाचा ठरल्याने त्यांनी जणू देवाचे आभार मानलेत. सात वर्षापूर्वी बेपत्ता असलेला आपला पोटचा गोळा सहीसलामत ध्यानीमनी नसताना अचानक घरी आल्याने आईला व काका हिम्मतराव यांना अश्रु अनावर झालेत. तर कुटूंबातील इतर सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बेपत्ता युवक अचानक घरी आल्याची वार्ता गावभर पसरताच त्याला बघण्यासाठी आबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती. यावेळी आपली आपबिती सांगताना तो सुरुवातीला नाशिक, पुणे, बंगलोर अशा विविध बड्या शहरात भटकंती करून सध्या जेजुरी, पुणे येथे एका हॉटेलात वेटर म्हणून काम करीत होता. त्याची कुटुंबाला भेटायची ओढ कित्येक दिवसापासून मनात होती. मात्र तो अशिक्षित असल्याने गाव कसे गाठायचे याचे संकट मनात होते. याबाबत सोबत काम करणाऱ्या मित्राला आपबिती सांगितली. शेवटी मित्राच्या मदतीने आपली जन्म भूमी गाठण्याचा प्रयत्न सफल केला.

Previous Post Next Post