*लांबोळा गावात एकच गणपतीची आदर्श परंपरा*. (प्रा. डी सी पाटील नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी ) शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातलं लांबोळा हे गाव. आजच्या धावपळीच्या काळातही एक अद्वितीय परंपरा जपणारं, समाजातील ऐक्याचं तेजस्वी उदाहरण ठरलेलं आहे. वर्षानुवर्षे लेवा पाटीदार गुजर समाज मंडळातर्फे येथे "एक गाव एक गणपती" शासनाच्या या संकल्पनेच्या पूर्वीपासून एकच गणेशोत्सव साजरा केला जातो. येथे पैशाची कमी नाही, पण साधेपणाचा दागिना परंपरेतून झळकतो. मोठ्या मूर्तीऐवजी, फक्त एका हाताएवढ्या उंचीचीच लहान मूर्ती गावाच्या घराघरांतल्या श्रद्धेत प्राण फुंकते.गणपतीची स्थापना श्रीकृष्ण रास गाऊन एका राहत्या घरी केली जाते. कुणावरही वर्गणीचं ओझं नाही ज्याला जमेल तेवढं योगदान, नाही दिलं तरी आनंदच. गणपतीसाठी भव्य पंडाल नाही, तर घराच्या उबदार ओट्यावर श्री गणेशाची स्थापना अन् अंगणातच आरती, भजन, गरबा आणि भाऊगर्दीतलं हास्य यामध्ये उत्सव उजळतो.पाचव्या दिवशी ठरलेल्या वेळेत पालखीतून गणेशाची मिरवणूक संपूर्ण गावात काढली जाते. प्रत्येक घराच्या अंगणात टाळ मृदुंगाच्या निनादात श्रीकृष्ण रास गाऊन बाप्पाचं पूजन होतं, ढोल-ताशांच्या गजरात तरुणाई आणि संपूर्ण गाव नृत्यात रंगून जाते. ते ही डीजे शिवाय आणि बाप्पांचं विसर्जनही सूर्यास्तापूर्वीच, गावाजवळच्या पवित्र गोमाई नदीत केलं जातं.अखेरच्या दिवशी भंडारा आयोजित होतो. गावकरी स्वतःच कच्ची शिदोरी गोळा करुन मेनूमध्ये खाटीदाळ अर्थात आंबट वरण, भात, घाटो अर्थात गोड पदार्थ आणि गलकांनु कढ्यानु अर्थात घोसाळ्याची भाजी बनवतात. येथे पहिला प्रसादाचा मान महिलांना, नंतर पुरुषांना मिळतो.गणपती विसर्जनानंतर जमाखर्चाचा हिशेब गावासमोर लगेच मांडला जातो आणि उरलेली रक्कम गुजर पंचांकडे सुपूर्त केली जाते. याच निधीतून समाजाने लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम, मृत्यूपश्चात कार्यासाठी आवश्यक भांडी, मंडप, गादी, खुर्च्या व इतर सुविधा खरेदी करून अत्यल्प दरात समाजासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. दुष्काळी काळात तर याच हुंडीतून प्रत्येक कुटुंबाला वर्षभराकरिता दहा हजार रुपये दिले गेले. विशेष म्हणजे, हा निधी कार्तिकी शुद्ध एकादशीच्या दिवशी परत गुजर समाज पंच मंडळाकडे जमा केले जातात आणि ही अलिखीत परंपरा आजवर कुणीही मोडलेली नाही.वर्षानुवर्ष चालणाऱ्या या परंपरेच्या यशामागे आहे समाजातील एकोपा, ज्येष्ठांचा मार्गदर्शनाचा दीप आणि प्रत्येकाने "माझं नाही, आपलं" या भावनेतून जपलेली आदर्श संस्कृती.लांबोळा गावानं दाखवून दिले की साधेपणातही गणपतीचा भव्य उत्सव होऊ शकतो. पैश्या ऐवजी ऐक्य आणि श्रद्धा हीच खरी श्रीमंती आहे समाज एकत्र आला की कोणतेही काम अशक्य राहत नाही . ‌🌑प्रा. डी. सी. पाटील, लांबोळा .माझ्या गावाने आतापर्यंत पाळलेली या प्रथा व परंपरेचे जपणूक आमच्या पिढीने केली आहे. यात कोणत्याही शासकीय विभागाचे मार्गदर्शन किंवा आदेश नाही. वंश परंपरेला जपणे व चुकीचा पायंडा नको हा विचार आम्ही करीत आलो आहेत. शांततेचे हे यज्ञ कायम राहील असा विश्वास पुढील पिढीला देण्यावर भर आहे.15 वर्षांपूर्वी आमच्या गावाला एकही गुन्हा दाखल नसलेले गाव म्हणून जिल्हा प्रशासनाकडून गौरविण्यात आले आहे.

लांबोळा गावात एकच गणपतीची आदर्श परंपरा*.                  
Previous Post Next Post