के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन संपन्न... (प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक). शहादा : येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात विचार मंथन सप्ताह अंतर्गत परिसरातील शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कृषी प्रदर्शन व मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी महात्मा गांधी जयंती ते मंडळाचे संस्थापक अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि. 2 ते 9 ऑक्टोबर दरम्यान विचार मंथन सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्या अंतर्गत मंडळाच्या कृषी महाविद्यालयात 'कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची नवी क्रांती' या विषयावर शेतकरी मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील होते.कार्पोरेट वॉरियर्स नाशिकचे कार्यकारी संचालक मनोज दंडगव्हाळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक शिवदास पाटील, लोकनायक जयप्रकाश सूतगिरणीचे संचालक गणेश पाटील, सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना श्री.दंडगव्हाळ म्हणाले, शेतात भेडसावणाऱ्या सध्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापर आवश्यक आहे. अन्नद्रव्य, व्यवस्थापन, जमीन, हवामान, कीटक रोग, पाणी इत्यादीचे व्यवस्थापन एआयच्या मदतीने करणे सोपे असून कमी खर्चिक असल्याचेही त्यांनी विविध मुद्द्यांद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले. अध्यक्षीय समारोपात बापूसाहेब दीपकभाई पाटील म्हणाले, आधुनिक युगात शेतात योग्य तंत्रज्ञानाच्या वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेती कामे सोपी व कमी खर्चिक होतात. मात्र तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापर करणे नुकसानकारक ठरू शकते. योग्य तंत्रज्ञान योग्य पद्धतीने योग्य वेळी वापरले गेले पाहिजे. एआय तंत्रज्ञान आपल्याला पूर्वकल्पना देते, म्हणून शेतीचे नियोजन करणे सोपे होणार आहे. एआय तंत्रज्ञान सर्वसाधारण शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व आभार प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. चंद्रशेखर पाटील यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील जयनगर, हिंगणी, बामखेडा, पिंगाने, भादे, लोंढरे, वडछील, प्रकाशा आदि भागातील शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. कृषी प्रदर्शनाचे आयोजन शेतकरी मेळाव्याच्या अंतर्गत करण्यात आले होते. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उत्पादित होणाऱ्या विविध जैविक निविष्ठा, गांडूळ खत, वर्मी वॉश, दुग्धजन्य पदार्थ, फेवरेट मिल्क, सेंद्रिय भाजीपाला, विविध फळ पिके, तसेच देशी-विदेशी भाजीपाल्याच्या रोपांचे प्रदर्शन मांडले होते. या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती दिली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

