आमोदा येथील मूर्ती विटंबना प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा २५ एप्रिलला आंदोलनाचा इशारा

आमोदा येथील मूर्ती विटंबना प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा २५ एप्रिलला आंदोलनाचा इशारा

(रविंद्र आढाळे विशेष  जिल्हा प्रतिनिधी)

यावल तालुक्यातील आमोदा गावात आदिवासी कोळी जमातीचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या प्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा २५ एप्रिल २०२६ रोजी कायदेशीर मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सकल आदिवासी कोळी जमात, जळगाव जिल्हा यांच्या वतीने देण्यात आला आहे.
यासंदर्भात फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आमोदा गावात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने काही समाजकंटकांनी महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची विटंबना केली. या प्रकरणात संशयित आरोपींना अटक करून तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या गंभीर प्रकरणाची माहिती यापूर्वीच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास देण्यात आली असून, संबंधित आरोपींना अटक करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आदिवासी कोळी समाजात संताप व्यक्त होत आहे.
तसेच, आदिवासी कोळी जमातीच्या काही तरुणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याबद्दलही निवेदनात आक्षेप नोंदवण्यात आला आहे. अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद करताना पोलिस प्रशासनाने सखोल शहानिशा करावी, अशी मागणी करण्यात आली.
पोलिस प्रशासनाने वेळेत दखल घेतली असती तर आमोदा गावातील वातावरण तणावपूर्ण झाले नसते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, उपविभागीय अधिकारी यावल, कार्यकारी दंडाधिकारी यावल तसेच फैजपूर मतदारसंघाचे आमदार यांना देण्यात आल्या आहेत.
Previous Post Next Post