धोदानी धबधब्यावर अंघोळीस बंदी घाला ; सुरक्षा व्यवस्था वाढवा - फरहान अमीन काल अकोल्यातील युवकाचा बुडून मृत्यू; प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

धोदानी धबधब्यावर अंघोळीस बंदी घाला ; सुरक्षा व्यवस्था वाढवा - फरहान अमीन 

काल अकोल्यातील युवकाचा बुडून मृत्यू; प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

(पातुर अकोला तालुका प्रतिनिधी दूल्हे खान)

पातूर : पातूर तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आलेल्या धोदानी धबधब्यावर वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ कठोर सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव मो. फरहान अमीन यांनी केली आहे.

पावसाळ्यामुळे धोदानी धबधब्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, वाढलेला पाण्याचा प्रवाह, निसरडे दगड, पर्यटकांची गर्दी आणि काही पर्यटकांकडून मद्यप्राशन करून पाण्यात उतरण्याचे प्रकार यामुळे येथे जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कालच धोदानी धबधब्यावर अकोला येथील एका युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने धबधबा परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर फरहान अमीन यांनी पातूर तहसीलदार यांना निवेदन देऊन धोदानी धबधब्यावर अंघोळ व पोहण्यास तात्काळ बंदी, शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी पोलीस बंदोबस्त, धोक्याचे सूचना फलक, मद्यप्राशन करणाऱ्यांवर कठोर कारवाई तसेच कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

“धोदानी धबधबा पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावा; मात्र तो पर्यटकांसाठी मृत्यूचा सापळा ठरू नये. नागरिकांच्या जीविताशी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही न केल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे फरहान अमीन यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नातीक शेख , सैय्यद फैझान आदी उपस्थित होते.

====================
“काल एका युवकाचा जीव गेला आहे. आता आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? दुर्घटना घडल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा दुर्घटना घडूच नये यासाठी प्रशासनाने आजच ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे,”
मो. फरहान अमीन 
प्रदेश सचिव:राष्ट्रवादी विध्यार्थी कांग्रेस, महाराष्ट्र
Previous Post Next Post