तिखोरा येथील गोमाई नदीवरील पुलाला अवजड वाहतूक वाढल्याने तडे; मोठी दुर्घटना होण्याची शक्यता... (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : शहादा तालुक्यातील तिखोरा नदीवरील पुलाला तडे पडले आहेत. डामरखेडा पुल धोकादायक ठरल्याने गत सहा महिन्यांपासून अवजड वाहतूक या पुलावरून सुरू आहे, त्यातून तडे पडले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पुलावरील अवजड वाहतूक तातडीने बंद न झाल्यास हा पुलावरील वाहतूकही काही महिन्यात बंद करावी लागण्याची भीती व्यक्त होत आहे. तसे झाल्यास उत्तर पश्चिम भागातील नागरिकांचा शहाद्याशी दैनंदिन कामकाजासाठीचा असलेला संपर्क तुटणार आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होत आहे. डामरखेडा येथील गोमाई नदीवरील पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पुल अवजड वाहतुकीस बंद करण्याचे सूचित केले असल्याने जिल्हाधिकारी यांनी या पुलावरील सर्व अवजड वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले. त्यात ही वाहतूक प्रकाशा येथील काथर्दे दिगर मार्गे तिखोरा येथील गोमाई नदीवरील पुलावरून जुन्या खेतिया रस्त्याने लोणखेडा मार्गे शहादा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एसटी प्रशासनाने अतिरिक्त पाच रुपये भाडे वाढवीत बसेस दिलेल्या मार्गाने सुरू केल्या. तर थोड्या विलंबाने अवजड वाहतूकही सुरू झाली. त्यामुळे या पुलावरील नियमित वाहतुकीस एसटी बसेस, रेतीचे ट्राले आणि अवजड वाहनांची वर्दळ अपेक्षेपेक्षा जास्त वाढली आहे. गोमाई नदीवरील तिखोरा येथील पुल हा तालुक्याच्या उत्तर पश्चिम भागाला तसेच तळोदा तालुक्याच्या बोरद भागाला जोडणारा महत्त्वाचा एकमेव महत्त्वाचा पुल आहे. या भागातील नागरिक दैनंदिन कामकाजासह शेतीमाल विक्री आणि विद्यार्थी शाळा महाविद्यालयाला जाण्यासाठी याच पुलाचा वापर करीत असतात. आज सायंकाळी काही नागरिकांना या पुलाच्या तिखो रा कडून येणाऱ्या भागाला एका ठिकाणी तडा पडल्याचे आढळून आले. अगोदरच पुलाला कठडे नाही. त्यात पुलाला तडे पडल्याने पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या पुलावरील रेतीचे ट्राले आणि अन्य अवजड वाहतूक तातडीने बंद करावी अशी मागणी सुरू झाली आहे. सदरची वाहतूक प्रकाशा येथून नंदुरबार, दोंडाईचा मार्गे वळविण्यात यावी अन्यथा सामान्य नागरिकांना शहादा येथे येण्यासाठी मोठा वळसा घेत म्हसावद मार्गे यावे लागेल आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सहा महिने झालेत तरी अद्याप डामरखेडा पुलाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केलेली नाही. लोकप्रतिनिधींनी यात गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0