*विधिमंडळात घुमणार केळी बोर्डाचा मुद्दा; राजेशदादा पाडवींचे शेतकऱ्यांना आश्वासन**नंदुरबारच्या केळीला चांगला भाव व निर्यातीची वाट मोकळी करण्यासाठी बोर्ड स्थापनेची मागणी*

*विधिमंडळात घुमणार केळी बोर्डाचा मुद्दा; राजेशदादा पाडवींचे शेतकऱ्यांना आश्वासन*
*नंदुरबारच्या केळीला चांगला भाव व निर्यातीची वाट मोकळी करण्यासाठी बोर्ड स्थापनेची मागणी*

(नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील )

शहादा   : नंदुरबार 
नंदुरबार जिल्ह्यात स्वतंत्र केळी बोर्डाची स्थापना करावी, या मागणीसाठी शहादा तहसील कार्यालयात गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार राजेशदादा पाडवी व जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती  
या बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी दीपक गिरासे, तहसीलदार संभाजी पाटील, ज्येष्ठ नेते बापूसाहेब दीपकजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर बैठक  
26 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या सूचनेनुसार झालेल्या बैठकीचा पुढील टप्पा म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केळी उत्पादक संघर्ष समिती (नंदुरबार जिल्हा), रयत शेतकरी संघटना, नंदुरबार केळी व पपई फळ बागायतदार संघ, केळी उत्पादक शेतकरी संघ तसेच जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

*या मुद्द्यांवर झाली चर्चा:
बैठकीत केळी उत्पादकांच्या प्रमुख अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये: *बाजारभाव: केळीला मिळणारा अपुरा बाजारभाव 
*निर्यात: निर्यातीसाठी आवश्यक सुविधा व संधी 
*पायाभूत सुविधा: शीतगृह, साठवणूक व प्रक्रिया उद्योगांची कमतरता 
*विपणन: उत्पादनाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी 
या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून, जिल्ह्यातील वाढते केळी उत्पादन व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता नंदुरबार येथे स्वतंत्र केळी बोर्डाची स्थापना करावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. 

*आमदार पाडवी यांचे आश्वासन: 
आमदार राजेशदादा पाडवी यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. “नंदुरबार जिल्हा केळी बोर्डाचा मुद्दा चालू विधिमंडळ अधिवेशनात प्रभावीपणे मांडला जाईल. पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून नंदुरबारसाठी स्वतंत्र केळी बोर्ड मंजूर व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,” असे त्यांनी स्पष्ट केले. 

*शेतकऱ्यांची तातडीची मागणी: 
बैठकीत उपस्थित सर्व शेतकरी व संघटनांच्या प्रतिनिधींनी नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र केळी बोर्डाची तातडीने स्थापना करण्याची जोरदार मागणी लावून धरली. 

नंदुरबार जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर असून, स्वतंत्र बोर्डामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ, चांगला भाव व निर्यातीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Previous Post Next Post