ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष; नागरिक संतप्त – गटारी सफाई न झाल्यास 7 एप्रिलला आंदोलनाचा इशारा. पाडळसे (प्रतिनिधी): "झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागं करता येत नाही," या शब्दांत ग्रामपंचायतीच्या कामकाजावर माजी सरपंच ज्ञानेश्वर तायडे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना तोंडी आणि लेखी अर्ज करूनही नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित केल्या जात असल्याची संतप्त भावना ग्रामस्थांमध्ये आहे. मते मागताना मतदारांच्या पाया पडणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवतात, अशी टीकाही करण्यात आली आहे.श्री दिलीप काका चौधरी यांच्या घरासमोर असलेल्या गटारीची स्थिती पाहता गावातील इतर भागातील परिस्थिती आणखी भयानक आहे. महिन्यानमहिने गटारीची सफाई होत नसल्यामुळे दुर्गंधी, डास आणि आजारांचे प्रमाण वाढले आहे. सफाई केलीच तर त्यात जमा होणारा कचरा वेळेत उचलला जात नाही, असा आरोप करण्यात येतो आहे.तायडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "ग्रामपंचायत पदाधिकारी जर गावकऱ्यांच्या समस्या सोडवू शकत नाहीत, तर त्यांनी तसे जाहीर करावे. गावकऱ्यांच्या समस्या आम्ही आमच्या पातळीवर सोडवू."नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. दिनांक 6 एप्रिल पर्यंत जर गटारीची सफाई झाली नाही, तर ग्रामपंचायत सरपंच यांच्या निवासस्थानी आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.“आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास सर्वस्वी ग्रामपंचायत पदाधिकारी जबाबदार राहतील,” असा स्पष्ट इशारा माजी सरपंच तायडे यांनी दिला आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0