*समग्र शिक्षाचे विजय दामले यांचा हृदय विकाराने मृत्यू*
*दीर्घकाळ आंदोलनाचा पहिला बळी : आंदोलन आणखी चिघळणार ?*
मानवत परभणी जिल्हा संपादक/ अनिल चव्हाण.
————————————
दिनांक ९ मे
समग्र शिक्षा अभियान जिल्हा अकोलाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय बापुराव दामले (वय ५१) यांचे आकस्मिक हृदय विकाराचे झटक्याने दिनांक ९ मे रोजी निधन झाले. आझाद मैदान मुंबई येथील समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिनांक ९ मार्च २०२६ पासून सुरू आहे. दीर्घकाळ आझाद मैदानावरील आंदोलनात विजय दामले यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. प्रकृती अस्वास्थ्यमुळे ते घरी परतले असता अचानक हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे ९ में रोजी सकाळी साडे सात वाजता निधन झाले.
विजय दामले हे गटसाधन केंद्र धारणी येथे विषय साधनव्यक्ती पदावर कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी अंजनगाव, अकोट येथे सेवा दिली. अकोला जिल्ह्याचे संघटनेचे नेतृत्व सुद्धा त्यांनी अनेक वर्ष केले. काल त्यांना अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला. रात्री परतवाडा येथील एका खाजगी रुग्णालयात भरती केले असता त्यांनी औषधोपचाराला योग्य प्रतिसाद न दिल्याने शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांचे मृत्यूपश्चात पत्नी व एक मुलगी असून दामले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
*दीर्घ आंदोलनाचा बळी :*
समग्र शिक्षा अभियान योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ६२ दिवसापासून आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलन दरम्यान सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कधी थाळीनाद, रस्ता रोको, वृक्ष चढाई, इच्छा मरणाची मागणी करणारे पत्र लिहणे.मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड लिहून त्यावर रक्ताने स्वाक्षऱ्या करणे, पुरुषांचे मुंडण आंदोलन केले. ८ तारखेला पुरुषांनी भर उन्हात दिवसभर बसून प्राणांकित आत्मक्लेश आंदोलन केले. दीर्घकाळ आंदोलन चालून सुद्धा सरकार दखल घेत नसल्याने आमचे आंदोलक सहकारी विजय दामले यांनी धसका घेतल्याने मृत्यू झाल्याचे अमरावती विषय साधनव्यक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष धीरज जवळकर यांनी म्हटले.
*मृत्यूची जबाबदारी कोणाची ?*
९ मार्च पासून आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्यातील अनेक आमदार, खासदारांनी भेट दिली. मात्र सरकारमधील एकाही मंत्र्याला या कर्मचाऱ्यांची भेट घ्यावीशी वाटली नाही. अखेर महिलांनी ८ मे ला
सामूहिक पद्धतीने मुंडण आंदोलन करण्याचा इशारा दिल्यावर सरकारने दिनांक १४ मे रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. दीर्घकाळ चाललेल्या या आंदोलनाने अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धसका घेतला असून विजय दामले यांच्या मृत्यूला वेळकाढू धोरण चालविणारे सरकार जबाबदार असल्याचा आरोप संघर्ष समितीचे प्रमुख योगिता बलाक्षे, श्री शिवकरण गोसावी, विवेक राऊत, संजय अकोले, प्रवीण मोहोड , ड्रॉ. केरबा कांबळे सह समग्र शिक्षाच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

