*मागील भानगडीची दुष्मणी काढण्यासाठीच माझ्या मुलाचा मृत्यू; पित्याचा गंभीर आरोप*
जळगाव | प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील रेल गावात क्रिकेट खेळताना एका मुलाने छातीत बॅट मारल्याने १२ वर्षीय गणेश पाटील याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र, हा मृत्यू अपघाती नसून मागील भांडणाची दुष्मणी काढण्यासाठीच मुलाला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप मृत मुलाच्या पित्याने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश पाटील हा मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना अचानक खाली पडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार केले.
घटनेनंतर काही दिवसांनी गावातील काही मुलांकडून गणेशच्या छातीत क्रिकेट बॅट मारण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर मृत मुलाच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. “मागील भानगडीची दुष्मणी काढण्यासाठीच माझ्या मुलाला लक्ष्य करण्यात आले,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, शवविच्छेदन न झाल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत मुलाच्या वडिलांकडुन करण्यात येत आहे.
पोलिसांनी तक्रार घेतली असून पुढील तपासाअंती गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

