पाल गावातील सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमणाचा आरोप; ग्रामस्थांची मुख्य अभियंत्यांकडे तक्रार..
वारंवार निवेदने देऊनही कारवाई नसल्याचा आरोप; तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी..
रावेर | प्रतिनिधी : फिरोज तडवी
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील तालुक्यातील मौजे पाल येथील सार्वजनिक रस्त्यावर काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्याचा आरोप करीत गावातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. संबंधित अतिक्रमण तातडीने हटवून नागरिकांना रस्त्याचा सुरळीत वापर करता यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गावातील संबंधित सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांच्या ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या परिस्थितीमुळे भविष्यात जीवित व वित्तहानीची शक्यता असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात यापूर्वीही संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली असून, अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पाहणी करावी व संबंधित रस्त्यावरी पाहणी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही पाल येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

