नंदुरबार शहराला तापी नदीवरून शाश्वत पाणीपुरवठा करणारी योजना महिनाभरात मंजूर करणार;कितीही दुष्काळ पडला तरी येणारी 25 वर्षे पाण्याची कमतरता भासणार नाही- डॉ.विजयकुमार गावित (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : गेल्या दोन वर्षांपासून नंदुरबार तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे नंदुरबार शहराची तहाण भागवू शकेल एवढा जलसाठा होवू शकला नाही. सध्या उपलब्ध जलस्रोतांच्या मर्यादा लक्षात घेवून येणाऱ्या 25 वर्षे वाढत्या लोकसंख्येच्या अंदाजाने नंदुरबार शहराला तापी नदीवरून शाश्वत स्वरूपात पाणीपुरवठा करणारी योजना महिनाभरात मंजूर करणार असल्याची माहिती आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. गावित बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी सावनकुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी नतीशा माथूर, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे व संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शहरात दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतो आहे. येणाऱ्या तीन महिने पुरेल एवढाच जलसाठा सध्या शिल्लक आहे. शहराची वाढती लोकसंख्या व गरज लक्षात घेवून तापी नदीवरून पाईपलाईनद्वारे विरचक धरणाच्या पाणीपुरवठा योजनेला जोडणाऱ्या योजनेचा सुमारे दिडशे ते पावणेदोन कोटी रूपयांचा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सन 2056 पर्यंत वाढणारी शहराची लोकसंख्या विचारात घेवून ही योजना तयार करण्यात आली असून प्रत्येक मनुष्याला दररोज 135 लिटर शुद्ध पाणी मिळेल या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात राज्याच्या मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून या योजनेला मंजूरी घेवून विधानसभा निवडणूकी आधी त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. या योजनांसाठी लागणाऱ्या सर्व तरतूदींचा प्रस्ताव येत्या आठ दिवसात प्रशासनामार्फत शासनास सादर करण्यात येईल, असे यावेळी नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
byMEDIA POLICE TIME
-
0