जंतर-मंतर लाठीचार्जाविरोधात भीम आर्मीचा संताप; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

जंतर-मंतर लाठीचार्जाविरोधात भीम आर्मीचा संताप; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

(जळगाव खान्देश विभागीय संपादक प्रविण मेघे:)

नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ भीम आर्मी भारत एकता मिशनने तीव्र संताप व्यक्त करत यावल येथील नायब तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले.

लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची सेवानिवृत्त उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र, निष्पक्ष व वेळबद्ध न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली.

तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, जखमी विद्यार्थी-विद्यार्थिनींना तातडीने मोफत वैद्यकीय उपचार, आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार असून, अशा आंदोलनांवर बळाचा वापर होणार नाही यासाठी केंद्र सरकारने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत. तसेच संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल जाहीर करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

लोकशाही, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा देशभरात लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने देण्यात आला.

यावेळी बबलू गजरे, सचिन पारधे, राहुल जयकर, सागर मेघे, अर्जुन अडकमोल, विक्की तायडे, रोहित सोनवणे, रवी भालेराव, करण अडकमोल, बंटी सोनवणे, आकाश गजरे, मंथन महिरे, पवन गजरे, सोहन गजरे व किरण सोनवणे उपस्थित होते.
Previous Post Next Post