*जैन संतांच्या मंगल प्रवेशाने हिंगणघाट धर्ममय*
*भव्य वरघोड्यासह मुनिराज श्री कंचनतिलक विजयजी म.सा. यांचा चातुर्मासिक मंगल प्रवेश*
(मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक )
हिंगणघाट । स्थानिक श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने अध्यात्म सम्राट परमपूज्य आचार्य भगवंत श्रीमद् विजय योगतिलकसूरीश्वरजी म.सा. यांचे शिष्य पूज्य मुनिराज श्री कंचनतिलक विजयजी म.सा. आदी ठाणा-८ तसेच पूज्य साध्वी आर्यदर्शिताश्रीजी म.सा. आदी ठाणा-९ यांचा १५ जुलै रोजी हिंगणघाट येथे भव्य चातुर्मासिक मंगल प्रवेश श्रद्धा, भक्ती आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संतांच्या नगरप्रवेशाने संपूर्ण हिंगणघाट धर्ममय वातावरणाने भारावून गेला.
सकाळी ८.३० वाजता सेंट जॉन कॉन्व्हेंटसमोरील कपूरचंद संदीप कोचर यांच्या निवासस्थानापासून भव्य वरघोडा काढण्यात आला. गाजावाजा, सुशोभित बग्गी आणि जयघोषाच्या वातावरणात निघालेली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर उपाश्रयात पोहोचली. शहरातील विविध सामाजिक संस्थांनी प्रमुख मार्गांवर आकर्षक स्वागत द्वार व गहुली सजावट करून गुरुभगवंतांचे स्वागत केले.
उपाश्रयात सकाळी १० वाजता आयोजित सत्कार समारंभाची सुरुवात महिला मंडळाने सादर केलेल्या मंगल स्वागतगीताने झाली. यावेळी आशीर्वचन देताना मुनिराज श्री कंचनतिलक विजयजी म.सा. म्हणाले की, जगातील प्रत्येक व्यक्ती सुखाच्या शोधात असते आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखासाठीच प्रयत्न करत असते. मात्र खऱ्या सुखाची ओळख नसल्यामुळे माणूस बाह्य भौतिक गोष्टींमध्ये सुख शोधतो. परंतु त्या गोष्टी त्याला सुख देण्याऐवजी त्यांचाच गुलाम बनवतात. भगवानांनी सांगितले आहे की, खरे सुख हे सद्गुणांमध्ये आहे. त्यामुळे जीवनात सुखी व्हायचे असेल, तर सद्गुणांची जोपासना आणि प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. चातुर्मासाच्या या चार महिन्यांत गुणांमधील खऱ्या सुखाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला मॅनेजिंग ट्रस्टी दिनेश कोचर, उपाध्यक्ष अनिल कोठारी, प्रतापचंद बैद, श्रीचंद कोचर, प्रकाशचंद चोरडिया, हप्पू बैद, शिखरचंद मुणोत, प्रदीप कोठारी, प्रसन्न बैद, शांतिलाल कोचर, गिरीष कोचर, नरेंद्र बैद, राजेश कोचर, कपूरचंद कोचर, राजेंद्र चोरडिया, मंगल कोचर, सुभाष कोठारी, शांतीलाल गांधी, सुरेश भंडारी, किशोर कोठारी, अशोक गांधी, वीर लोढ़ा यांच्यासह मोठ्या संख्येने श्रावक-श्राविका उपस्थित होते. ही माहिती राजेश अ. कोचर यांनी दिली.

